सोलापूर - गेल्या दोन वर्षांपासून प्रतीक्षेत असणारी मिरज ते पंढरपूर या रेल्वेमार्गाची सुरक्षा आयुक्तांकडून होणारी अंतिम तपासणी 8 ते 10 फेब्रुवारी या तारखेला होत आहे. मिरज ते पंढरपूर या 132 किलोमीटर मार्गाची तपासणी समाधानकारक आढळल्यास व या मार्गाबाबत सुरक्षा आयुक्तांनी हिरवा कंदील दाखविताच या मार्गावरून प्रवासी रेल्वे धावू शकेल, असा विश्वास सोलापूर विभागीय रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सुशील गायकवाड यांनी व्यक्त केला. बहुप्रतीक्षेत असणारा हा रेल्वे मार्ग काही दिवसातच सुरू होणार असल्याचे दृष्टिपथात आल्याने रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
सुरक्षा आयुक्तांनी दिलेल्या अहवालानुसार त्रुटी नसतील तर 15 फेब्रुवारी अन्यथा एक मार्च अशा दोन तारखांना हा मार्ग सुरू होऊ शकतो, अशी शक्यता आहे.
सोलापूर-...
more... कोल्हापूर या गाडीमुळे कोल्हापूरला महालक्ष्मीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांबरोबर पंढरपूरला येणाऱ्या विठ्ठलभक्तांचीही मोठी सोय होणार आहे. म्हणूनच या मार्गावरून धावू शकणाऱ्या नियोजित गाड्यांना लवकरात लवकर हिरवा झेंडा दाखविण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
पंढरपूर ते मिरज या दरम्यानचे 132 किलोमीटर मीटरगेज मार्गाचे ब्रॉडगेज लोहमार्ग रुंदीकरण 15 जुलै 2008 पासून प्रत्यक्ष सुरू झाले. अडीच वर्षांपासून हे काम सुरू आहे. त्यात गेल्या दोन महिन्यांपासून या मार्गावरून मालगाड्यांची वाहतूकही सुरू आहे. रेल्वे प्रशासनातर्फे डिसेंबरपर्यंत 09 हे काम पूर्ण होणार असल्याचे प्रारंभी सांगितले होते. त्यानंतर फेब्रुवारी 2010 पर्यंत काम पूर्ण होण्याची अपेक्षा असल्याचे सातत्याने सांगितले जात होते. आता फेब्रुवारी 2011 पर्यंत म्हणजे तब्बल दोन वर्ष हे काम रखडल्याचे दिसून येते. मिरज ते पंढरपूर दरम्यानचे काम आता पूर्ण झाल्याने कर्नाटक, गोवा भागातून येणाऱ्या लाखो वारकऱ्यांची सोय होणार आहे.
खंडित परंपरा होईल सुरू
कर्नाटकातील बेळगाव, धारवाड, हुबळी, विजापूर, गोकर्ण, गोवा भागातील लाखो वारकरी मिरजेस येऊन याच गाडीने तर कधी कधी टपावर बसूनही विठ्ठलाच्या दर्शनास जात. ही परंपरा 82 वर्षे टिकली. ब्रॉडगेज वाहतूक सुरू झाल्यावर कर्नाटकसह मिरज कोल्हापूर आदी भागातील वारकऱ्यांना कमी वेळेत येता येईल.
कोल्हापूर ते सोलापूर थेट गाडी
मिरज ते पंढरपूर हा मार्ग सुरू झाल्यास गत रेल्वे अंदाजपत्रकात मंजूर करण्यात आलेली कोल्हापूर ते सोलापूर ही दैनंदिन गाडी सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.
तीन महाव्यवस्थापकांच्या तीन तारखा
मध्य रेल्वेच्या तत्कालीन महाव्यवस्थापिका सौम्या राघवन यांनी हे काम डिसेंबर 2009 मध्ये पूर्ण होईल, असे जून 2008 च्या पंढरपूर दौऱ्यात सांगितले होते. त्यानंतरचे सरव्यवस्थापक बी. बी. मोडगिल यांनी 2009 या वर्षात केलेल्या वार्षिक तपासणीदरम्यान हा मार्ग फेब्रुवारी 2010 पर्यंत सुरू होणे अपेक्षित असल्याचे सांगितले होते. त्यानंतर पदावर आलेले व सध्याचे सरव्यवस्थापक कुलभूषण नुकतेच सोलापूर विभागात वार्षिक तपासणीसाठी आले असता त्यांनी फेब्रुवारी 2011 पर्यंत हा मार्ग सुरू होईल असे सूतोवाच केले होते. तीन महाव्यवस्थापकांनी तीन तारखा दिल्याची चर्चा असून किमान आता मार्ग सुरू होईल, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.
सुरक्षा आयुक्तांनी अहवालाद्वारे हिरवा कंदील दाखविल्यानंतर लगेचच या मार्गावरून प्रवासी रेल्वे गाडी सुरू होईल. फेब्रुवारीचा दुसरा आठवडा यादृष्टीने महत्त्वाचा आहे.
- सुशील गायकवाड, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक