दिवंगत नेते विलासराव देशमुख यांनी अथक प्रयत्नाने सुरू केलेली मुंबई-लातूर एक्सप्रेस कोणत्याही परिस्थितीत मुंबई-नांदेड होणार नाही , असे होईल तेव्हा लातूरकरांच्या अस्मितेबरोबर जनआंदोलनात पहिला मी असेल ,' असे उद्गार लातूरचे खासदार जयवंतराव आवळे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत काढले.
गेले महिनाभर लातूरच्या अस्मितेचा आणि विकासाचा विषय झालेली मुंबई-लातूर ही एक्सप्रेस नांदेडपर्यंत वाढविण्याच्या रेल्वे मंत्री पवनकुमार बन्सल यांच्या घोषणेमुळे संतापाचे वातावरण होउन रेल रोको , लातूर बंद अशी आंदोलने झाली आहेत. संसदेच्या सुरू असलेल्या प्रथम सत्रात लातूर राखीव लोकसभा मतदारसंघासाठी विचारलेल्या प्रश्नांची आणि केलेल्या मागण्यांची माहिती खासदार जयवंतराव आवळे पत्रकार परिषदेत देत होते.
आवळे...
more... म्हणाले , ' नांदेड-मुंबई रेल्वे सुरू करण्यासाठी पूर्वीचे नांदेडचे खासदार भास्करराव खतगावकर यांनी रेल्वेमंत्र्याना पत्र दिले होते. मीसुद्धा लातूर रेल्वेस्टेशनची सुधारणा आणि लातूर-मुंबई रेल्वे मुरुडला थांबावी , यासाठी पत्र दिले आहे. उदगीर मुंबई आणि नांदेड-मुंबई नवी रेल्वे सुरू करण्यासाठी रेल्वे मत्र्यांकडे पाठपुरावा सुरू आहे. '
गेल्या वर्षीही मुंबई रेल्वे नांदेडपर्यंत जाणार असे घोषित झाले होते त्यावेळी दिवंगत नेते विलासराव देशमुख यांनी ममता बॅनर्जींना भेटून ती रद्द केली होती. दिल्लीत महाराष्ट्रासाठी अनेक अडचणी निर्माण होत असल्याच्या वेदनाही आवळे यांनी बोलून दाखविल्या. लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पुलाच्या बांधकामासाठी केंद्र सरकारच्या पंतप्रधान सडक योजनेतून ६५ कोटी रुपये मंजूर झाले असून त्यातूनच रेणापूर तालुक्यातील पुलाच्या कामाला सुरुवात झाली असल्याची माहिती त्यांनी दिली. लातूर जिल्हा टंचाईग्रस्त जाहीर करावा , मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यात एक विशेष बैठक घ्यावी , अधिकाऱ्यांना पाठवून माहिती घ्यावी , या मागण्या मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे आवळे म्हणाले.