महालक्ष्मी एक्स्प्रेसला आता कर्नाटकचा सहवास
मिरज - कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस गाडी आज रात्रीपासून दक्षिण-मध्य रेल्वेकडे हस्तांतरित झाली. रिशेड्युलिंगच्या प्रक्रियेत ती तब्बल साडेतीन तास उशिरा सुटली. प्रवाशांचे हाल झाले. कोल्हापुरातून ती रात्री 8.25 वाजता निघते. मात्र रात्री 11.55 वाजता सुटली. मिरज स्थानकात रात्री दीड वाजता आली. महालक्ष्मीने जाणारे प्रवासी रात्री साडेनऊपासून ताटकळत होते.
मध्यरेल्वेकडून महालक्ष्मी एक्स्प्रेस आता दक्षिण-मध्य रेल्वेकडे गेली. मुख्यालय सिकंदराबाद राहणार आहे. गुंटकल विभागाकडे तिच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. तिचा पूर्वीचा क्रमांक 11011 आणि 11012 बदलला आहे. तो 17411 आणि 17412 झाला. नवे डबे जोडणे, वाढवणे, स्वच्छता, वेळेतील बदल आदी बाबी आता...
more... गुंटकल विभाग पाहिल. 1 एप्रिल 2011 पासून पश्चिम महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणून धावणारी गाडी कन्नडिगांच्या सहवासात गेली. महाराष्ट्रातील राजकारण्यांची अनास्था आणि हतबल प्रवाशांमुळे हक्काची गाडी कर्नाटकात गेली. गाडीसंबंधीच्या तक्रारीसाठी आता मराठी प्रवाशांना गुंटकल आणि सिकंदराबादला वाऱ्या कराव्या लागणार. तेथे किती दाद घेतली जाईल, याबद्दल शंकाच आहे.
महालक्ष्मीच्या बदल्यात हरिप्रिया एक्स्प्रेस (नवा क्रमांक 11416 आणि 11415) मध्य रेल्वेकडे आली. ही गाडी आता कोल्हापूर-तिरुपती आणि कोल्हापूर-सोलापूर मार्गांवर धावेल. हरिप्रिया मध्य रेल्वेकडे गेल्याने गुंटकल विभागाने नवा रेक कोल्हापुरात आज पाठवला. हा नवा रेक आणि महालक्ष्मी यांच्यातील डब्यांच्या अदलाबदलीसाठी बराच वेळ लागणार असल्याने महालक्ष्मी एक्स्प्रेस रात्री साडेतीन तास उशिरा निघाली. प्रवाशांना पुरेशी कल्पना नसल्याने ते अडकून पडले. रात्री साडेदहानंतर सह्याद्री, कोल्हापूर-सोलापूर आणि महालक्ष्मी या गाड्या एकापाठोपाठ सुटल्या.
डबे कमी होण्याची शक्यता
महालक्ष्मी एक्स्प्रेसचे तीन डबे कमी होण्याची शक्यता आहे. सध्या 21 डब्यांसह धावते. तिला हरिप्रियाचे कनेक्शन आहे. हरिप्रिया 18 डब्यांची आहे. या दोन्ही गाड्या एकसारख्या करण्यासाठी महालक्ष्मीच्या तीन डब्यांचा बळी देण्याचा निर्णय गुंटकल विभाग घेऊ शकतो. थ्री टायर एसी, एक स्लिपर आणि एक जनरल डबा कमी होऊ शकतो.